Wednesday 22 December 2010

मी भारतीय आहे

एक दिवस ऑफिसमधून घरी येत होते. ऑफिस सुटायची वेळ असल्याने नेहमीप्रमाणे ट्रेनमध्ये गर्दी होती. पण नशीब चांगल म्हणून निदान बसायला तरी जागा मिळाली.


मी जागा पटकावून जरा स्थिरस्थावर झाले. सहज समोरच्या सीटवर बसलेल्या एका महिलेकडे लक्ष गेल. तर ती मलाच निरखून पाहत होती. मला जरा विचित्रच वाटल पण काहीतरी प्रतिक्रिया द्यायची म्हणून मी तिच्याकडे पाहून स्मितहास्य केल. तीही माझ्याकडे पाहून हसली. लगेच तिने प्रश्न विचारला "Speak English or Netherlands?".. मी म्हणाले इंग्लिश. इथे बेल्जियम मध्ये फ्रेंच आणि डच या दोन भाषा बोलल्या जातात. आणि इथल्या लोकांचा कल हा शक्यतो इंग्लिश चा वापर न करणे यावरच असतो. तुम्ही कुठेही जा, सर्व सूचना,वेगवेगळे बोर्डस सर्व काही इथल्या भाषेतच असतात.

माझ उत्तर ऐकून त्या बाईने पुढच संभाषण सुरु केल. "तुम्ही इथल्या दिसत नाही. " "मी भारतीय आहे." मी उत्तर दिले. "Oh! really. Your eyes are very beautiful and you have got a very beautiful smile too.". तिच्या ह्या प्रतिक्रियेने अंगावरून क्षणभर मोरपीस फिरल्यासारख वाटल.

मी तिला thanx म्हटलं. "मला वाटलच तू भारतीय असशील.कारण मला वाटत फक्त भारतीय स्त्रियांचेच डोळे इतके सुंदर असतात." मी काहीही न बोलता तिच बोलण ऐकत होते.

ती बराच वेळ माझ्याशी बोलत होती. भारत कसा आहे? तिथले लोक कसे आहेत? इथे आणि तिथे काय फरक आहे?
असे अनेक प्रश्न तिने विचारले. 
 
ती म्हणाली तिलाही एकदा भारतात जायचय आणि तिथल वेगळेपण पहायचय. ती सांगत होती, तिची एक मैत्रीण आहे आणि ती 2 वर्षे भारतात राहून आली आहे.तिच्याकडूनही तिने बरच ऐकलं होत. आमच्या बोलण्याच्या नादात तीच स्टेशन कधी आल कळलंच नाही. माझा निरोप घेवून आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देवून ती बाई निघून गेली.


ती गेल्यावर मी विचार करत राहिले. आज आपल्या देशात कितीही समस्या असोत, कितीही घोटाळे होत असोत, भ्रष्टाचार ,गरिबी यांना ऊत आला असेल, तरीही आपल्याला अभिमान वाटाव्या अशा बऱ्याच गोष्टीही ह्याच देशात आहेत. आणि ह्याची प्रचीती देशाच्या बाहेर गेलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक भारतीयाला येत असेल ह्याची मला खात्री आहे.


माई

आपल्या आजूबाजूच्या समस्या पाहिल्या की आपण किती कळवळून बोलतो, माझ्याकडे थोडे जास्त पैसे असते तर मी नक्की काहीतरी केले असते..किवा मी माझ्या सर्व जबाबदारयातून मोकळा/मोकळी झालो/झाले की ह्या समाजासाठी नक्की काहीतरी करेन. मला वाटत आपल्यापैकी बऱ्याच जणांना माझं हे म्हणन पटेल कारण मी ही हे वाक्य बऱ्याच वेळा बोलले आहे.

हे सार इथे सांगण्याचं कारण हेच, की जी मानसं अशा कामासाठी स्वतःच आयुष्य वेचतात ते आपल्यासारखे महिन्याला काही dollars किवा Euros कमावणारे नसतात पण तरीही आपल्यापेक्षा खूप वेगळा विचार करतात.

मी बोलतेय ते महाराष्ट्रातील एका थोर महिलेबद्दल. ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र माई म्हणून ओळखतो त्या सौ. सिंधुताई सपकाळ.
झी मराठीवर त्यांची मुलाखत पाहिली आणि मग त्यांच्या कर्तृत्वाबद्दल लिहिण्याचा मोह आवरता आला नाही.
 नुकताच त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच माईंनी एक छान विचार बोलून दाखवला.
"देवा आम्हाला हसायला शिकव पण आम्ही कधी रडलो होतो ह्याचा विसर पडू देवू नकोस."

विदर्भातील एका छोट्याश्या खेड्यात माईंचा जन्म झाला. त्यांचं खर नाव होत "चिंधी". एक नको असलेल मूल म्हणूनच बहुतेक अस नाव आई वडिलांनी ठेवलं असाव. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. घरच्या कामातून वेळ मिळेल तशा त्या शाळेत जायच्या. अतिशय गरीब परिस्थितीत त्यांचं बालपण गेला. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचं लग्न त्यांच्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असणाऱ्या श्रीहरी सकपाळ यांच्याशी झालं. लग्न झालं तरी त्यांची शिक्षणाची,वाचनाची आवड काही कमी झाली नाही. वाणसामान खरेदी करताना त्याला गुंडाळून आलेले वर्तमानपत्र हेच त्यांच्या वाचनाचे साधन बनले. पण सासू आणि नवरा ह्या दोघानाही त्यांची ही सवय आवडत नव्हती.


एका कसल्याशा संशयावरून वयाच्या २० व्या वर्षी माईना  नवऱ्याने घराबाहेर काढले, त्यावेळी त्यांच्या पदरात नुकतीच जन्मलेली त्यांची मुलगी होती.

त्यावेळी त्यांनी स्मशानामध्ये रात्र काढली...का तर त्याच्या एवढी सुरक्षित जागा दुसरी नवतीच. मानसं एक तर मेल्यावर स्मशानात जातात आणि जिवंत मानसं भुतांच्या भीतीने स्मशानात जात नाहीत.

मुलीला घेवून त्या वणवण फिरल्या. स्वताच नको असलेल नाव बदलून त्यांनी सिंधू अस ठेवलं. आपल्या एका लेकीला वाढवता वाढवता समाजातील इतरही लेकरांची माय होवून त्यानाही पाहू लागल्या.

त्यांची एक गोष्ट एकदमच भारावून टाकणारी आहे. ती म्हणजे, त्यांची स्वतःची मुलगी त्यांनी दगडूशेठ हलवाई Trustla देवू केली. कारण काय तर स्वतःची मुलगी आणि इतर अनाथ मुल ह्यांच्यात आई म्हणून फरक होवू नये.

आज माईंची १०४२ मुल आहेत. त्यातील कोणी वकील कोणी डॉक्टर झालाय तर एकजण खुद्द मायीन्च्याच जीवनावर PhD करतोय. त्यांची मुलगी स्वतःच एक वेगळं अनाथालय चालवते.

त्यांना आतापर्यंत २७२ वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या पुरस्कारातील रकमेतून मुलांसाठी जागा घेवून त्यांच्यासाठी एक घर माईंनी मिळवून दिलंय. आणि अजूनही सतत आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी त्या झटत असतात. विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने त्यांची अमेरिकावारीही झाली आहे.


अलीकडेच प्रदर्शित झालेला "मी सिंधुताई सकपाळ" हा त्यांच्या जीवनावर रचित चित्रपट त्यांची संपूर्ण जीवनयात्रा मांडतो. त्यांची जीवनकहाणी समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहिला पाहिजे.

त्यांच्या चित्रपटात जे म्हटलंय ते माईंच्या बाबतीत अगदी खर आहे....."देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली.."




सौजन्य: विकिपीडिया , झी मराठी.

Monday 20 December 2010

एक छानस वाक्य

देवा आम्हाला हसायला शिकव पण आम्ही कधी रडलो होतो ह्याचा विसर पडू देवू नकोस.....

Saturday 18 December 2010

नव्याने सुरुवात

खुप उत्साहात हा ब्लॉग सुरु केला खरा...पण नेहमीचा आळस आड़ आला॰ पण सध्या इथे भरपूर रिकामा वेळ असल्याने आणि इन्टरनेट व्यतिरिक्त दुसरे कसलेही मनोरंजनाचे साधन नसल्याने म्हणा, ब्लॉग वर नियमित लिहिता येईल असे वाटते....

ह्या सुरुवातीसाठी माझ्या मलाच खुप खुप शुभेच्छा....:)