Wednesday 22 December 2010

माई

आपल्या आजूबाजूच्या समस्या पाहिल्या की आपण किती कळवळून बोलतो, माझ्याकडे थोडे जास्त पैसे असते तर मी नक्की काहीतरी केले असते..किवा मी माझ्या सर्व जबाबदारयातून मोकळा/मोकळी झालो/झाले की ह्या समाजासाठी नक्की काहीतरी करेन. मला वाटत आपल्यापैकी बऱ्याच जणांना माझं हे म्हणन पटेल कारण मी ही हे वाक्य बऱ्याच वेळा बोलले आहे.

हे सार इथे सांगण्याचं कारण हेच, की जी मानसं अशा कामासाठी स्वतःच आयुष्य वेचतात ते आपल्यासारखे महिन्याला काही dollars किवा Euros कमावणारे नसतात पण तरीही आपल्यापेक्षा खूप वेगळा विचार करतात.

मी बोलतेय ते महाराष्ट्रातील एका थोर महिलेबद्दल. ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र माई म्हणून ओळखतो त्या सौ. सिंधुताई सपकाळ.
झी मराठीवर त्यांची मुलाखत पाहिली आणि मग त्यांच्या कर्तृत्वाबद्दल लिहिण्याचा मोह आवरता आला नाही.
 नुकताच त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच माईंनी एक छान विचार बोलून दाखवला.
"देवा आम्हाला हसायला शिकव पण आम्ही कधी रडलो होतो ह्याचा विसर पडू देवू नकोस."

विदर्भातील एका छोट्याश्या खेड्यात माईंचा जन्म झाला. त्यांचं खर नाव होत "चिंधी". एक नको असलेल मूल म्हणूनच बहुतेक अस नाव आई वडिलांनी ठेवलं असाव. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. घरच्या कामातून वेळ मिळेल तशा त्या शाळेत जायच्या. अतिशय गरीब परिस्थितीत त्यांचं बालपण गेला. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचं लग्न त्यांच्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असणाऱ्या श्रीहरी सकपाळ यांच्याशी झालं. लग्न झालं तरी त्यांची शिक्षणाची,वाचनाची आवड काही कमी झाली नाही. वाणसामान खरेदी करताना त्याला गुंडाळून आलेले वर्तमानपत्र हेच त्यांच्या वाचनाचे साधन बनले. पण सासू आणि नवरा ह्या दोघानाही त्यांची ही सवय आवडत नव्हती.


एका कसल्याशा संशयावरून वयाच्या २० व्या वर्षी माईना  नवऱ्याने घराबाहेर काढले, त्यावेळी त्यांच्या पदरात नुकतीच जन्मलेली त्यांची मुलगी होती.

त्यावेळी त्यांनी स्मशानामध्ये रात्र काढली...का तर त्याच्या एवढी सुरक्षित जागा दुसरी नवतीच. मानसं एक तर मेल्यावर स्मशानात जातात आणि जिवंत मानसं भुतांच्या भीतीने स्मशानात जात नाहीत.

मुलीला घेवून त्या वणवण फिरल्या. स्वताच नको असलेल नाव बदलून त्यांनी सिंधू अस ठेवलं. आपल्या एका लेकीला वाढवता वाढवता समाजातील इतरही लेकरांची माय होवून त्यानाही पाहू लागल्या.

त्यांची एक गोष्ट एकदमच भारावून टाकणारी आहे. ती म्हणजे, त्यांची स्वतःची मुलगी त्यांनी दगडूशेठ हलवाई Trustla देवू केली. कारण काय तर स्वतःची मुलगी आणि इतर अनाथ मुल ह्यांच्यात आई म्हणून फरक होवू नये.

आज माईंची १०४२ मुल आहेत. त्यातील कोणी वकील कोणी डॉक्टर झालाय तर एकजण खुद्द मायीन्च्याच जीवनावर PhD करतोय. त्यांची मुलगी स्वतःच एक वेगळं अनाथालय चालवते.

त्यांना आतापर्यंत २७२ वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या पुरस्कारातील रकमेतून मुलांसाठी जागा घेवून त्यांच्यासाठी एक घर माईंनी मिळवून दिलंय. आणि अजूनही सतत आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी त्या झटत असतात. विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने त्यांची अमेरिकावारीही झाली आहे.


अलीकडेच प्रदर्शित झालेला "मी सिंधुताई सकपाळ" हा त्यांच्या जीवनावर रचित चित्रपट त्यांची संपूर्ण जीवनयात्रा मांडतो. त्यांची जीवनकहाणी समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहिला पाहिजे.

त्यांच्या चित्रपटात जे म्हटलंय ते माईंच्या बाबतीत अगदी खर आहे....."देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली.."




सौजन्य: विकिपीडिया , झी मराठी.

No comments: